मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राचा फोटो राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. यात त्यांनी सरकारमध्ये असलेल्या 3 नेत्यांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
‘महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत. आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?’, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी फडणवीसांना केला आहे. या पत्रात संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भूसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी पत्रात काय लिहिले आहे?
‘मी आपलं एक वक्तव्य ऐकलं, व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणाला ‘मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!’ आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात ते महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या बाबत कारवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यासंह येऊन भेटू इच्छितो, गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात’, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती.
बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत
त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve pic.twitter.com/0HsVAk02J3— Sanjay Raut (@rautsanjay61) April 4, 2023
राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचं मनी लाँडरींग केल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केल्याचा आरोप आहे. तर दादा भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने शेतकऱ्यांकडून 178 कोटींचे 25 लाख शेअर्स गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाइटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.