डॉ. जहिर अहमद पटवेकर यांची सूचना
कोल्हापूर – सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रमजान महिन्यात रोजा (उपवास) अत्यावश्यक मानला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांना उपवास ठेवणे अवघड जाते. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण कमीजास्त झाले की अशा रूग्णांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच मधुमेहाच्या रूग्णांनी उपवास करायचा की नाही हे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ठरवावे. डॉक्टरांनी जर परवानगी दिली तर काही सावधगिरीचे उपाय योजून उपवास केला जाऊ शकतो, असे डॉ. जहिर अहमद पटवेकर यांनी म्हटले आहे.
मधुमेहाच्या रूग्णांनी उपवास करण्याबाबत डॉक्टरांकडून स्पष्ट सल्ला घ्यावा. रमजानच्या आधी, सुरू असताना आणि नंतर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला पाहिजे. उपवास सुरू असताना औषधे आणि इन्सुलिनच्या डोसमध्ये बदल करणे आवश्यक आहे. उपवास सुरू असताना रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे. विशेषत: जर इन्सुलिन घेत असाल तर रोज येणाऱ्या संभाव्य समस्यांबाबत माहिती करून घ्या असेही डॉ. पटवेकर यांनी सांगितले.
मधुमेहाच्या रूग्णांनी आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करावा. जेवणात अधिक तंतुमय पदार्थ घ्यावेत. सेहरीचे भोजन पोटभरून घ्यावे. इफ्तारनंतर ते सेहरीच्या दरम्यान 3 ते 4 लीटर पाणी, साखर न घातलेले पेय, ताक पिऊ शकता, कोल्ड्रिंक्स घेऊ नये.
डॉ. पटवेकर यांच्या मते रमजान सुरू होण्याच्या 1 ते 2 महिने आधी साखरेचे प्रमण नियंत्रणात हवे, साखर कमी होणे किंवा जास्त होणे यापैकी कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करावा. रक्तातील साखर जर 70 पेक्षा कमी किंवा 300 पेक्षा जास्त असेल. तर उपवास लगेच सोडावा. शक्यतो तळलेले पदार्थ, मिठाई आणि कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन करू नयेंत. उपवास करताना जास्त मेहनत किंवा व्यायाम करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपली औषधे घेण्याचे बंद करू नका, असे डॉ. पटवेकर यांनी सांगितले.