मुंढवा, दि. 18 (प्रतिनिधी) -मुंढवा-केशवनगर परिसर कंटेनर मुक्त करीत “स्वच्छ संस्थे’तर्फे परिसरात, प्रत्येक वॉर्ड, गल्लीत कचरा गोळा करणारे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परंतु, त्यानंतरही अनेक ठिकाणी मुख्यरस्त्यावरील पदपथांवर “अशिक्षीत’ नागरिक कचरा टाकत आहेत. तो उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. मुंढव्यात स्वच्छता अभियानाचा पुरता बोजवारा उडाला असताना क्षेत्रीय कार्यालयाच्या स्वच्छता विभागाचेही याकडे दुर्लक्ष आहे. येथील रस्त्यांची तसेच पदपथांची स्वच्छतेची मागणी होत आहे.
मुंढवा-केशवनगर परिसरात “स्वच्छ’ संस्थेतर्फे कचरा वेचक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक घरातून दरमहा 50 ते 60 रुपये हे कचरा वेचक घेतात. काही भागात नित्याने ही सेवा पुरवली जाते. काही भागात कचरा वेचक आणि नागरिकांमध्ये पैशांवरुन वाद होतात. यामुळे काही नागरिक स्वतः कचरा नेऊन टाकतात. परंतु, हा कचरा कोठे टाकला जातो? असा प्रश्न निर्माण होत आहे. असे नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने अन्न, चाऱ्याच्या शोधात मोकाट जनावरे तेथे गर्दी करतात. यामुळे कचरा सर्वत्र पसरतो. काही नागरिक तर राजरोसपणे मोकळी जागा दिसेल तेथे कचरा टाकत आहेत. स्वच्छता विभागाकडून वेळोवेळी सूचना करूनही नागरिकांमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही.