प्रभात वृत्तसेवा, पुणे, दि. 28 –आरोपींना कोणतीही दया-माया न दाखवता त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, खुनाचा कट हा आधीच रचला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधाराला तत्काळ अटक करावी. अशी मागणी नाना पेठ परिसरातील संतप्त नागरिकांनी समर्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे अश्वासन वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांनी नागरिकांना दिले.
सोमवारी (दि. 25) मध्यरात्री नाना पेठेतील नवा वाड्यामध्ये राहत असलेल्या तरुणाचा जुन्या वादातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी 24 तासाच्या आत दोघांना अटक केली. अक्षय वल्लाळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नवा वाडा, नाना पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड (वय 33, रा. नवा वाडा, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत अक्षय वल्लाळ याची परिसरात चांगली ओळख होती. त्याच रागातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दोन्ही आरोपींनी केलेले कृत्य घृणास्पद असून, त्यांना साथ देणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कारवाई व्हावी. तसेच हा गुन्हा पूर्वनियोजित होता. गुन्ह्याच्या दोन तास आधीच त्याचे कुटुंबीय घर सोडून गेले. त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. नागरिकांनी समर्थ पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला.