भिगवण -येथील परिसरात उजनी धरणाच्या सान्निध्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सध्याच्या बिकट परिस्थितीत मासेमारीला परवानगी दिली आहे. मात्र मासळी बाजार बंद आहे. भिगवणला महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासळी बाजार आहे. येथून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व महाराष्ट्राबाहेर सुद्धा मासा पाठवला जातो. मोठ्या संख्येने लोक एकत्र जमतील या कारणास्तव इतर बाजाराप्रमाणेच यावरही बंदी आहे.
मात्र मच्छीमारांच्या उपजीविकेचा विषय लक्षात घेऊन शासनाने मच्छिमारांना मासे पकडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मच्छीमार स्थानिक ठिकाणी मासेमारी करून विविध ठिकाणी मासे विक्री करत आहेत. त्याद्वारे मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. मात्र या परिसरातील हॉटेल व्यवसाय व बाहेरील ग्राहकांची मागणी कमी असल्याने मासळीला सध्यातरी उठाव नाही. माशांचे दर कमी झालेले आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने मागणीवर परिणाम झालेला आहे.
सर्वाधिक पकडला जाणारा चिलापी माशाचा दर सुमारे प्रति किलो 14 ते 40 रुपयांच्या दरम्यान आहे. लॉक डाऊन होण्याअगोदर मार्च महिन्यात हेच दर सुमारे 70 ते 140 रुपये किलो होते. इतर माशांचे दर 100 ते 200 रुपयांच्या दरम्यान आहेत. पाचशे रुपये किलो विकला जाणारा गुगळी, मरळ या प्रकारचा मासा सध्या सुमारे दीडशे ते दोनशे रुपये किलो विकला जात आहे. पडील, कटला व रोहू या माशांचे दर शंभर ते सव्वाशे रुपयांच्या दरम्यान आहेत. मासळी सापडत असूनही दर घटल्याने मच्छीमारांचे नुकसान होत आहे. हातचा चाललेला मासेमारी हंगाम आणि कमी दर यामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत.
मच्छीमारांना लागले बाजाराचे वेध
उजनी परिसरातील गोड्या पाण्यातील माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल, बाजार बंद आहेत . त्यामुळे खवय्यांनीदेखील याकडे पाठ फिरवली आहे. मच्छीमारांनाही लॉकडाऊन कधी उठणार व बाजार कधी सुरू होणार याचे वेध लागले आहेत. यामुळे माशांचे बाजारभाव खाली आले आहेत. त्यामुळे मच्छीमारांना उदरनिर्वाह करण्यापुरतेही पैसे मिळत नाहीत.