Imtiaz Jaleel: मुंब्र्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र ‘हिरवा’ करणार; सहर शेखच्या समर्थनार्थ इम्तियाज जलील यांची गर्जना
Imtiaz Jaleel: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'रंगांचे युद्ध' पेटले असून, एमआयएम (AIMIM) आणि सत्ताधारी महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

Imtiaz Jaleel: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘रंगांचे युद्ध’ पेटले असून, एमआयएम (AIMIM) आणि सत्ताधारी महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुंब्र्यातील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी शहराला ‘हिरव्या रंगात’ रंगवण्याचे विधान केल्यानंतर आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे.
सहर शेख यांचे समर्थन करतानाच, “केवळ मुंब्राच नव्हे, तर येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू,” असा दावा जलील यांनी केला आहे.
वादाची ठिणगी नेमकी काय?
महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंब्रा येथे विजय मिळवलेल्या एमआयएमच्या युवा नगरसेविका सहर शेख यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक खळबळजनक विधान केले होते. “अल्लाहची ताकद आपल्यासोबत आहे. पुढील पाच वर्षांत मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवून टाकू,” असे आवाहन त्यांनी केले होते.
तसेच, आगामी काळात मुंब्र्यातील प्रत्येक जागेवर एमआयएमचाच उमेदवार असेल, असा दावाही त्यांनी केला होता. या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर
सहर शेख यांच्या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत सुनावले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की, “मुंब्रा हा ठाणे जिल्ह्याचा भाग आहे आणि ठाण्याची ओळख ही ‘भगव्या’ रंगाशी जोडलेली आहे. अशा परिस्थितीत भगव्यात हिरवा रंग कसा काय मिसळला जाऊ शकतो?” मुंब्रा हे भगव्याचे बालेकिल्ला असल्याचे संकेत देत त्यांनी सहर शेख यांना सबुरीचा सल्ला दिला.
किरीट सोमय्यांची तक्रार आणि पोलिसांची नोटीस –
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सहर शेख यांना नोटीस बजावली आहे. चिथावणीखोर वक्तव्ये करू नका, अशी ताकीद पोलिसांनी त्यांना दिली आहे.
सहर शेख यांचे स्पष्टीकरण-
वाढता वाद पाहून सहर शेख यांनी आपली बाजू मांडली आहे. “माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, म्हणूनच मी हिरव्या रंगाचा उल्लेख केला. जर माझ्या पक्षाच्या झेंड्याचा रंग भगवा किंवा निळा असता, तर मी त्याच रंगाचा उल्लेख केला असता,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
सहर शेखने मागितली माफी –
सहर शेखने आपल्या विधानाविषयी 23 जानेवारी रोजीच माफीनामा दिला आहे, असे त्यांनी सोमय्यांना सांगितले. मुंब्रा येथील सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाचा झेंडा व निशाणीच्या संदर्भात होते. या प्रकरणी कुणाचेही मन दुखावण्याचा व सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू व तिरंग्यासाठीच मरू.
त्यामु्ळे माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची जाहीर व लेखी स्वरुपात माफी मागते, असे सहर शेखने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे. तिचा माफीनामा स्वीकारल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंदवले आहे. भविष्यात अशा प्रकारचे विधान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची तजवीज या माध्यमातून पोलिसांनी केली आहे.





