पुसेगाव -पुसेगावातील टपाल कार्यालयाचे कामकाज गेली तीन महिने बंद पडले असून अडचणीच्या काळात वारंवार हेलपाटे घालूनही ठेवींचे पैसे मिळत नाहीत. ठेवीदारांची अडवणूक दोन दिवसांत न थांबल्यास हे कार्यालय रस्त्यावर आणू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रताप जाधव यांनी दिला आहे.
याबाबत जाधव यांनी ठेवीदारांसोबत शुक्रवारी टपाल कार्यालयात जाऊन पोस्टमास्तर गोरे यांच्याशी चर्चा केली. जाधव म्हणाले, लॉकडाऊनमुळे लोकांच्या जवळचे पैसे संपले आहेत. शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून येथील टपाल कार्यालयाचे काम तीन महिने बंद आहे. गोरगरीबांनी रोजंदारीतून मिळलेले थोडेथोडे पैसे ठेवींच्या रूपात पोस्टात ठेवले आहेत; पण अडचणीच्या वेळेला पैसे मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
बीएसएनएलकडून कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने व्यवहार ठप्प आहेत. ही बाब आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे. कनेक्टिव्हिटी सुरू करणे आपल्या अखत्यारीत नसल्याचे उत्तर पोस्टमास्तर गोरे यांनी दिल्याचे जाधव यांनी सांगितले. आपण बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. बीएसएनएलचे कार्यालय असलेल्या जागेचे भाडे थकीत आहे. त्यामुळे जागामालकाने कार्यालयास टाळे ठोकले आहे.
जागामालकाला भाडे मिळताच कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटू शकतो. बीएसएनएल कार्यालयाचे दोन वर्षाचे भाडे थकल्याची माहिती देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. गावातील अन्य संस्थांना कनेक्टिव्हिटी मिळत असताना पोस्ट कार्यालयाचीच अडचण का? असे विचारले असता, पोस्टमास्तर गोरे यांनी थातुरमातुर उत्तर दिले. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुसेगाव पोस्टातील ठेवीदारांना पैसे काढण्याची सोय खटाव येथे करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे. पोस्टाच्या वरिष्ठांनी पुसेगाव पोस्ट कार्यालयातील व्यवहार दोन दिवसांत सुरू करावेत अन्यथा कार्यालय रस्त्यावर आणू, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.