नवी दिल्ली – देशासह राज्यात सुद्धा करोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ब्रेक द चैन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध काहीसे शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोनाकाळात रेल्वे प्रशासनानं अनेक मार्गांवरील गाड्या रद्द केल्या होत्या. दरम्यान, आता यातील काही गाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. यामध्ये मनमाडसह नाशिक जिह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मनमाड आणि नाशिककरांची जीवनवाहिनी समजली जाणारी मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस होणार सुरू करण्यात येणार आहे. मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस 26 जून (शनिवार) पासून सुरु करण्यात येणार आहे. तर मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही 25 (शुक्रवार) तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.