पिंपरी | माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

पिंपरी, (प्रतिनिधी) – माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी चोवीस तास परवानगी द्यावी.
या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.26) भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला.
बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते.
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे,
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणार्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलीस विभागाने मेट्रोचे काम करणार्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी.
याकाळात वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने मार्गी लावा
मेट्रो लाईन तीनच्या कामात येणार्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.
मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.





