नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याने देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाचा नवीन अंदाज काय? हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील दोन दिवसांत झारखंड, राजस्थान, ओडिशा आणि बिहारमध्ये अतिमुसळधार पाऊस घेऊन येणार आहे. 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि सिक्कीममध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा कमी दाबाचा पट्टा राजस्थान आणि पंजाबच्या आसपास सक्रिय राहणार आहे, ज्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढेल. यापूर्वीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिमुसळधार पावसाने महाराष्ट्रात मोठा कहर केला होता. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तर अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि पूरस्थिती निर्माण झाली. शेतकरी हवालदिल झाले असतानाच आता पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.