कोपरगाव – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या “शिर्डी ते भरवीर’ (ता. इगतपुरी) या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, गत डिसेंबरमध्ये “नागपूर ते शिर्डी’ या मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर आज आपण दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. सुप्रीम कोर्टाने आपला मार्ग मोकळा केला तसा आम्ही समृद्धी मार्गाचा दुसरा टप्पा मोकळा केला. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही शब्दाला जागतो ते आमचे कर्तव्य आहे. आम्ही जे करतो ते जाहीरपणे शब्द देवून करतो. काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करीत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला.
शिंदे ठाकरेंबद्दल बोलताना पुढे म्हणाले, बंद खोलीत वाकडे तिकडे बोलायला ते मोकळे असतात. पण ते सर्व बाहेर आलेच. त्यावर मी बोलणार नाही. आमचे पुस्तक खुले आहेत. मेहनत, कष्टातून वेळेत प्रकल्प पूर्ण होतात. माझ्यावर समृद्धीची जबाबदारी दिली. लोकांना हे स्वप्नवत वाटत होते पण मला आणि फडणवीसांना खात्री होती. अनेक अडथळे आले. ते निर्माण केले गेले. विरोध केला, विरोध करायला लावला गेला,
मात्र आम्ही करून दाखवले. फडणवीसांनी सर्व अधिकाऱ्यांनासह मेहनत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडथळे दुर करून महामार्ग मोकळा केला. आपण आज पाचशे वीस किलोमिटरचा रस्ता करू शकलो तो, पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळेच.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण महामार्ग सुरू करू. तिसरा टप्पा थेट मुंबईपर्यंत जाईल असा माझा विश्वास आहे. रस्ते विकास विभागाचे मंत्री तेव्हा शिंदे होते व मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी समृद्धी महामार्गाचे स्वप्न आम्ही बघितले. राज्याचा विकास करायचा असेल तर मागास भाग राजधानी मुंबईला जोडणे आवश्यक आहे.
मुझे रास्ता बनाने का शौक!
“ग्रीन फिल्ड समृद्धी महामार्ग तयार करणे म्हणजे अनेक लोकांना स्वप्न वाटत होते. पण मला पूर्ण विश्वास होता तसा एकनाथ शिंदे यांनाही होता. मी आणि शिंदे लोकांना सांगत होतो की, “मुझे रास्ते बनाने का शौक है…’ फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले. फडणवीस पुढे म्हणाले,
मी आमदारांची बैठक घेतली. राज्याचे सर्व संपादक बोलावले व त्यांना मदतीची विनंती केली. विरोधाच्या काळात प्रकल्पाच्या बाजूने उभा राहीलात तर महाराष्ट्राचे कल्याण होईल असे म्हणून आम्ही त्यांची मदत घेतली. आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतले. जमीन भुसंपादनाचा नविन कायदा आपण संमत केला. त्यानंतर न भुतो न भविष्यती असा दर आम्ही दिला.