Sandeep Deshpande : भारतातील सर्वात आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील, असे वक्तव्य मुकेश अंबानी यांनी केले. त्यांच्या या विधानावर मनसेने आक्षेप घेतला आहे. ‘तुमची कंपनी गुजराती असेल तर बोऱ्याबिस्तारा गुंडाळा आणि गुजरातला जा’ असा हल्लाबोल मुकेश अंबानी यांच्यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
“रिलायन्स ही एक भारतीय कंपनी आहे, असं आम्हाला वाटत होते. पण अंबानी यांनी स्पष्ट सांगून टाकलं की रिलायन्स एक गुजराती कंपनी आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर तुम्ही महाराष्ट्रात आलाच कशाला? जमिनी पण महाराष्ट्रातल्या वापरल्या मराठी माणसाने जमिनी दिल्या, त्याचाच उपयोग करत उद्योग करताय ना? जर तुमचा आणि महाराष्ट्राचा संबंधच नसेल तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, “यापुढे मराठी माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, आपण एका गुजरात कंपनीकडून वस्तू घेत आहोत. मुकेश अंबानी यांचा उद्देशच जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात काय करता आहात? हा प्रश्न आहे.”
पंतप्रधान पण फक्त गुजरातचेच आहेत का ?
मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बाजूला उपस्थित होते तेव्हा हे विधान केले. पंतप्रधान यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं तुमची कंपनी भारतीय आहे की पंतप्रधान पण फक्त गुजरातचेच आहेत? आम्ही महाराष्ट्राच्या मुद्यावर लढतो, तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित बोलतो. मात्र कोण संकुचित आहे, हे स्पष्ट झाले आहे. यातून मराठी माणसाने जागरूक होणं गरजेचं आहे,” असेही देशपांडे म्हणाले.