नगर -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज असून, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक रित्या घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. करोनाची साखळी तोडायची असेल तर “चेस दी व्हायरस’ अशा पद्धतीने आता आरोग्य यंत्रणा काम करणार आहे. ज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
ज्यांना लक्षणे नाहीत, अशा करोनाबाधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करुन घ्यावे.
जिल्ह्यात पहिल्या तीन महिन्यात बाधितांची संख्या आटोक्यात होती. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद या शासकीय यंत्रणांसह लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था यांनीही त्याकामी महत्वाची भूमिका बजावली. मात्र, लॉकडाऊन शिथीलतेनंतर बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढला आणि त्यातून संसर्गाचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसत आहे.
हे रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जलद गतीने बाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी अँटीजेन चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळांमधूनही करोना तपासणी करण्यात येत आहे. यामुळे करोना बाधित रुग्णाचे लवकर निदान होत असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे शक्य होत आहे.