रहिमतपूर : नगरपालिकेची सत्ता माझ्याकडे गेली २५ वर्षे असताना भ्रष्टाचाराचा एकही आरोप माझ्यावर झालेला नाही. परंतु, रहिमतपूरमध्ये काहीही झालं तरी घाव मात्र सुनील माने यांच्या डोक्यावरच टाकला जातो. माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायची धमक असेल तर गांधी चौकात समोरासमोर या, असे जाहीर आव्हान सुनील माने यांनी विरोधकांना दिले. रहिमतपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ काल झालेल्या सभेत ना. जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी सुनील माने यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना सुनील माने यांनी आक्रमक होत उत्तर दिले. अध्यक्षस्थानी प्रा. भानुदास भोसले होते. यावेळी अविनाश माने, आनंदा कोरे, धैर्यशील सुपले व सर्व उमेदवार उपस्थित होते. श्री. माने म्हणाले, ‘‘कोविड काळात रहिमतपूरच्या नागरिकांचा आरोग्याचा विचार तरी यांना केला होता का? परंतु, व्यासपीठावरुन माझ्यावर टीका करणे सोपे जाते. प्रशासकीय कालावधीत गेली चार वर्षे कामे रखडली याचा हिशोब तुम्ही मला का मागता, माझ्या सत्तेच्या कालावधीत केलेल्या कामांचा हिशोब द्यायची माझी तयारी आहे. रहिमतपूरसाठी मंजूर झालेले दहा कोटी आमदारांनी परत का घालवले याचा हिशोब द्यावा.’’ रहिमतपूरच्या निवडणुकीत बाहेरची माणसं मतदानासाठी कशासाठी बोलवत आहात, सा प्रस्न त्यांनी केला. म्हसवडला दहा दिवसातून एकदा पाणी येतं हेच सत्यच आहे. ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदीतून जिहे- कटापूर योजनेतून तुम्ही पाणी उचललं, आंधळी धरणात सोडलं. तुमच्यामुळेच चार दिवस रहिमतपूरला पाणी मिळालं नाही. तुम्ही कधीही मला म्हसवडला बोलवा, समोरासमोर चर्चेला यायची माझी तयारी आहे. म्हसवडच्या सिद्धनाच्या मंदिरात बसूनच चर्चा करु, असे आव्हान त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांनाच दिले. वासुदेव माने यांनीही विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ज्यांना मोठं केलं त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. रहिमतपूरच्या विकासाची दृष्टी समोर न ठेवता फक्त सुनील माने यांना विरोध करायचाच म्हणून विरोध होत आहे. परंतु, इथली जनता त्याला भीक घालणार नाही. रहिमतपूरमध्ये जनाधार कमी आहे म्हणून तुम्ही मतदार यादीत घोळ करून बाहेरच्या मतदारांची नावे घुसवली आहेत. स्वकर्तृत्वावर विश्वास न ठेवणारी माणसं असला उद्योग करत असतात, अशी टीका त्यांनी केली. विकासाचे व्हिजन सुनील मानेंकडे- शंभूराज देसाई सर्वसामान्य नागरिकांचा विकास कसा करायचा याचे व्हिजन सुनील माने यांच्याकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांना रहिमतपूरमधून चांगला पाठिंबा मिळत आहे. विकासासाठी लागणारी सर्व मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्यामधून दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील रोकडेश्वर मंदिरासमोरील जाहीर सभेत ते बोलत होते. विकासाच्या माध्यमातून मतदारासमोर जात आहोत. याठिकाणी टीकाटिपणी करण्यापेक्षा आम्ही कामावर जास्त लक्ष देतो.