पुणे -“देशाला पुढे न्यायचे असेल तर कॉंग्रेस सोबत हवीच. कॉंग्रेसबद्दल द्वेष पसरविण्यात धन्यता मानणारा पक्ष सत्तेत असला, तरी कॉंग्रेसमुक्त भारत या अघोरी विचाराविरोधात आम्ही समविचारी पक्ष सोबत राहून लढा देऊ,’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यावेळी पवार यांनी जून्या आठवणीना उजाळाही दिला.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या 137 व्या वर्धापनदिनानिमित्त शहर कॉंग्रेसतर्फे कॉंग्रेसभवनमध्ये स्नेहमेळावा घेण्यात आला. याप्रसंगी शरद पवार यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पवार यांचे स्वागत केले. छत्रपती शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर कॉंग्रेस भवनमध्ये आल्याचा आनंद आहे. सन 1958 ला कॉंग्रेसचा सभासद झाल्यानंतर रोजची संध्याकाळ इथल्या कटट्यावर मोठ्या लोकांचे विचार ऐकण्यात जायची. कॉंग्रेसची स्थापना होण्याआधी भारतीय राष्ट्रीय सभा नावाची संघटना होती. या सभेचे रुपांतर कॉंग्रेसमध्ये व्हावे, अशी बैठक पुण्यात झाली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या स्थापनेची बैठकी बैठक होणार होती. मात्र प्लेगमुळे ही बैठक मुंबईला घेण्यात आली होती, असे पवार यांनी सांगितले. पुणे कॉंग्रेस व या कॉंग्रेस भवन इमारतीला मोठे राजकीय संदर्भ आहेत. प्रदेश कॉंग्रेसचे कार्यालय हे येथेच होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉंग्रेसला त्रास झाला. त्यानंतर कॉंग्रेसजनांनी शक्ती उभी करून इंदिरा गांधीच्या मदतीने पंडित नेहरूंना महाराष्ट्र निर्मितीसाठी तयार केले, असेही पवार यांनी सांगितले.
24 वर्षांनंतर कॉंग्रेस भवनाला भेट
शरद पवार यांनी सन 1999 ला कॉंग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापन केली. सन 1958 पासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय असलेले पवार यांच्या कॉंग्रेस भवनातील अनेक आठवणी आहेत. पण कॉंग्रेस सोडल्यानंतर ते कधीही येथे आलेले नव्हते. आता वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत पवार यांनी कॉंग्रेस भवनाला भेट दिली. राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी उपस्थिती लावली. गप्पा, आठवणींनी उजाळा दिला.