श्रीगोंदा – श्रीगोंद्यात दुकाने सुरू करताना प्रशासनाने केलेल्या सूचना पाळणे सर्वांवर बंधनकारक आहे. श्रीगोंद्यात दुकाने सुरू होवून काही दिवसच झाले आहेत. बेफिकिरी दाखवाल तर दुकाने पुन्हा बंद करू, असा इशारा तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिला आहे.
यासंदर्भात माळी यांनी सर्वाना आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की, प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मोबाईलची दुकाने, स्वीट होमची दुकाने, बेकरी, जनरल स्टोअर्स, ज्वेलरीची दुकाने या दुकानांवर कुठल्याही प्रकारचे सूचना जसे ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटीझर न वापरणे, मास्क न वापरणे, आदी सूचनांचे पालन होतांना दिसून येत नाही. विशेषतः श्रीगोंदा शहर आणि काष्टी याठिकाणी बेफिकिरी दिसून येत आहे. सूचनांचे जर पालन झाले नाही तर वरील नमूद सर्व दुकाने बंद करण्यात येतील.
श्रीगोंद्या शहरात व्यवहार सुरू झाल्यामुळे पूर्वीसारखी मोठी गर्दी होऊ लागली आहे. नागरिक मोठ्या संख्येने खरेदी व इतर कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. ठरावी दुकाने गर्दीने झाकळून जात आहे. करोना अद्याप गेलेला नाही. तालुक्याची सीमा असणाऱ्या दौंडमध्ये अद्याप करोना रुग्ण आहेत. या सर्व बाबींचा विचार करता श्रीगोंद्यात होणारी गर्दी प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे.