Aditya Thackeray : पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले आहेत. पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे शहरातील मुंढवा परिसरात ४० एकर जमिनीशी संबंधित प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून पार्थ पवार यांना लक्ष्य करत महायुती सरकावर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले असून, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पार्थ पवार यांच्या मामेभावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच या प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “या प्रकरणात दोन गोष्टी आहेत. एक मी ऐकले की, यामध्ये कोणत्यातरी रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. जर ऐवढी मोठी गोष्ट असेल, हा घोटाळा खरा असेल तर या एका निलंबनाने हा विषय संपणार आहे का? असा सवाल विचारत आणि दुसरी गोष्ट अशी की, भाजपाच्या मित्रपक्षांना आता कळले असेल की, ते जवळ तर घेतात पण बदनाम करून सोडतात.” अशी खोचक प्रतक्रिया त्यांनी दिली आहे. प्रकरण काय? पुण्यातील महार वतनाची ४० एकर जमीन अमेडिया या कंपनीने १८०० कोटींची बाजारभाव असताना ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या कंपनीचे संचालक पार्थ पवार आहेत. या कंपनीत दिग्विजय पाटील नावाच्या व्यक्तीचीही भागीदार आहे. या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्यात आल्याचा आरोप होत आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून आरोपांची राळ उठवली असून, पार्थ पवार अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा : रेवंत रेड्डी यांच्या मुस्लिमांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर भाजपची टीका ; व्होट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप