मुंबई – हनुमान चालिसाच्या नावाखाली दंगली घडवून देशाचे तुकडे पाडण्याचा कट रचला जात असून असा कट रचणाऱ्यांविरुद्ध शिवसेना लढत आहे. आमच्या या भूमिकेचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे जर आज हयात असते तर त्यांनी स्वागतच केले असते असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जर पाणी डोक्यावरून वाहू लागले तर इतरांना त्या पाण्यात बुडवावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी हनुमान चालीसा वाचल्याबद्दल लोकांना अटक केली जात असल्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले होते, त्यावर राऊत यांनी ही टिप्पणी केली.
आज येथे पत्रकारांशी बोलतानो ते म्हणाले की, त्यांनी (चौबे) बाळासाहेब ठाकरेंची काळजी करण्याची गरज नाही. हनुमान चालिसाच्या नावाने दंगली घडवून देशाचे तुकडे पाडण्याचा कट रचणाऱ्यांशी शिवसेना लढत आहे. तसे केल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर फुलांचा वर्षावच केला असता आणि आमच्या भूमिकेबद्दल त्यांना आनंद झालो.
हनुमान म्हणजे काय हे आम्हाला माहीत आहे. महाराष्ट्र हा राम आणि हनुमानाचा पूजक आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची काळजी करू नका, असे राऊत यांनी चौबे यांना सुनावले. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत असल्यापासून काही प्रकरणांमध्ये आधी संयम पाळला होता. पण जर पाणी डोक्यावरून वाहू लागले तर आम्हाला त्या पाण्यात इतरांना बुडवावे लागेल, असेही ते म्हणाले.