Sushma Andhare : … दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर….; ते फोटो पाहिल्यानंतर सुषमा अंधारेंनी व्यक्त केली हळहळ… म्हणाल्या

पुणेः गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरंपच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्र हळहळला होता. या प्रकरणाचा मास्टरमाईंट वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. काल माध्यमांत देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोत आरोपींनी क्रूरतेचे परिसीमा ओलांडल्याचे दिसत आहे.
देशमुख यांच्या हत्येचे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता आरोपींना फाशींची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच बीड जिल्हा बंदीची हाकही देण्यात आली आहे. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माणसांना संपवण्यासाठी … दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर आग लागो अशा सत्तेला…अंधारे यांनी घडल्या प्रकरणी आपली तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याविषयी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट लिहिली आहे.
‘मी राक्षस बघितला नाही. दंतकथेत त्याची वर्णन ऐकली वाचली आहेत. पण आजचे फोटो बघितल्यानंतर त्या राक्षसांचे चेहरे कसे दिसत असतील त्याची कल्पना येतेय. प्रचंड अस्वस्थ आहे. कितीही प्रयत्न केला तरी श्वास आणि मन अजूनही संतुलित करता येत नाही. माझी ही अवस्था असेल तर ज्या माऊलीने लेकरू गमावले त्या मायमाऊलीचं काय..? असा प्रश्न अंधारेंनी या पोस्टमधून उपस्थित केला आहे.
एवढं होऊनही बीड शांत आहे. परळी शांत आहे. परळीतली नेतेमंडळी शांत आहेत. त्यांच्या शांत असण्याची कारण काहीही असू देत. पण मी शांत आहे. मी का शांत आहे. मी दहशतीखाली आहे का. मला सतत भीती वाटतेय का..? माणसांना संपवण्यासाठी. दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर आग लागो अशा सत्तेला. जळो तुमचं राजकारण. जळो तुमचे डावपेच. हा माझा प्रांत नाही. मला इतकं क्रूर व्हायचं नाही. मी माणूस आहे… अन् माझं माणूसपण या क्रूर राजकारणापेक्षा लाख मोलाचं आहे… !!!” अशी तीव्र शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
इतकं क्रौर्य उरात घेऊन माणसा जगतात तरी कशी..? आपल्याकडे सत्ता असली पाहिजे सत्ता असल्यानंतर आपल्याला गोरगरिबांचे प्रश्न मांडता येतील त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवता येईल असं वाटत होतं. पण संतोष अण्णाच्या बाबतीचे घडले ते बघितल्यानंतर माझ्याकडे सत्ता नाही याचा मला आनंद आणि समाधान वाटतय. तुम्ही कुठला तो पिक्चर म्हणताय तो मी नाही बघितलेला. पण कदाचित त्याच्यात सुद्धा औरंगजेबाच्या क्रौर्याची ही परिसीमा दाखवली नसेल. असे त्या म्हणाल्या.
इतका हिंसक आणि क्रूर विचार घेऊन ही माणसं जगत कशी असतील. यांच्या रक्तामासाच्या कुटुंबीयांना बोलताना भेटताना पोटच्या लेकराच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवताना त्या पोटच्या लेकराला अशा गिधाड्यांच्या हातात माया जाणवत असेल का. की त्यांचंही अंग शहारून थरारून जात असेल. आपला बाप भाऊ मुलगा इतका क्रूर आहे की त्याने प्रेमाने जरी पाठीवरून हात फिरवला तरी त्याची नखं आत रुतून जातील आणि आपण रक्तबंबाळ होऊन जाऊ हा विचार त्यांच्या लेकरांच्याही मनात येत असेल का… ? अशा प्रकारच्या भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या आहेत.





