मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यात सोमवारी वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरुन शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. वैधानिक विकास महामंडळाची न घोषणा करण्यावरून भाजपानं ठाकरे सरकार हल्लाबोल केला. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “१२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्यावरून ठाकरे सरकार आणि विरोधी भाजपा यांच्यात पहिल्याच दिवशी सामना रंगला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. राज्यपालांकडे प्रलंबित असलेली विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाली की, दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ दिली जाईल,” असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले होते. त्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला होता.
१२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2021
या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “१२ आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” असं टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर डागलं आहे.