ICC Women’s T20 World Cup : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; असं करणारा ठरला पहिला आशियाई संघ
आयसीसी वुमन्स टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Women’s T20 World Cup) भारतीय महिला संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध मैदानात उतरत एक नवा इतिहास रचला आहे.

ICC Women’s T20 World Cup : आयसीसी वुमन्स टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Women’s T20 World Cup) भारतीय महिला संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध मैदानात उतरत एक नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि त्यांच्यावर प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली.
मात्र, भारतीय फलंदाजांनी या आव्हानाचे संधीत रुपांतर करत अत्यंत आक्रमक सुरुवात केली. निर्धारित २० षटकांत भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावांचा डोंगर उभारला. या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडचा (ICC Women’s T20 World Cup) संघ पूर्णपणे अपयशी ठरला आणि भारताने हा सामना ९५ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या दणदणीत विजयासोबतच भारतीय संघाने क्रिकेट जगतात अनेक मोठ्या विक्रमांची नोंद केली आहे.
आशिया खंडातील पहिलाच देश; वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच २०० पार!
भारतीय महिला संघाने या सामन्यात २०९ धावा करत वुमन्स टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कपमध्ये अशी अफाट कामगिरी करणारा भारत हा संपूर्ण आशिया खंडातील पहिलाच देश ठरला आहे. यापूर्वी आशियातील कोणत्याही महिला संघाला टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात २०० धावांचा आकडा गाठता आला नव्हता.
वर्ल्ड कपच्या इतिहासातील ‘टॉप ३’ मध्ये एन्ट्री
वुमन्स टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही भारतीय महिला संघाची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि एकूण इतिहासातील (ICC Women’s T20 World Cup) तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या यादीत अव्वल स्थानी इंग्लंड संघ असून त्यांनी बांगलादेशविरुद्ध २१९ धावा केल्या होत्या, तर २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २१३ धावा करत इंग्लंडचाच संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारताने २०९ धावांसह या ‘टॉप ३’ च्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री मारली आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील चौथी मोठी धावसंख्या
भारताची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही एकूण चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने २०२५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २२१ धावा, २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २१७ धावा आणि २०२५ मध्येच इंग्लंडविरुद्ध २१० धावा ठोकल्या होत्या. आता नेदरलँडविरुद्ध नोंदवलेली २०९ ही भारताची चौथी मोठी धावसंख्या ठरली आहे.
धावांच्या फरकाने भारताचा पाचवा मोठा विजय
नेदरलँडचा ९५ धावांनी पराभव करत भारतीय संघाने धावांच्या फरकाने आपल्या टी-२० इतिहासातील पाचव्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ५ विजयांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
१. मलेशियाविरुद्ध (२०१८): १४२ धावांनी विजय
२. युएईविरुद्ध (२०२२): १०४ धावांनी विजय
३. बार्बाडोसविरुद्ध (२०२२): १०० धावांनी विजय
४. इंग्लंडविरुद्ध (२०२५): ९७ धावांनी विजय
५. नेदरलँडविरुद्ध (२०२६): ९५ धावांनी विजय
या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील मनोधैर्य कमालीचे वाढले असून, संघाने थेट जेतेपदासाठी मजबूत दावेदारी ठोकली आहे.





