Sanjay Raut : “मोठी क्रांती झाली असे मी म्हणणार नाही, पण…”; पोटनिवडणूक निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
Sanjay Raut : अशातच उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या निकालावर भाष्य केलं असून, त्यांच्या नजरेतून निकालाचं विश्लेषण त्यांनी केलं आहे.

Sanjay Raut : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. याशिवाय नवीन यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. यानंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदलही झाले. मात्र, नुकत्याच झालेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या मतदारसंघात ३० वर्षांपासून भाजपची सत्ता होती. या निवडणुकीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी या निकालावर भाष्य केलं असून, त्यांच्या नजरेतून निकालाचं विश्लेषण त्यांनी केलं आहे.
अहंकार लोकांनी मोडून काढला
“बांकीपूरमधून कुत्र्या-मांजराला उमेदवारी दिली तरी ते जिंकून येतील,” असं एक वक्तव्य भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केलं होतं. या वक्तव्याचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेत त्यांना सणसणीत टोला लगावला. “हे काही आश्चर्य वाटावे असे निकाल नाही. बिहारमधली बांकीपूरची जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्यांचे वडील हे १९९५ पासून ती जागा जिंकत आहेत आणि हा भाजपचा गड असलेली जागा भाजपने प्रशांत किशोर यांच्याकडून गमावली. तसेच हा अहंकार लोकांनी मोडून काढला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मोदी आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे, हे तुमच्या….
यासोबत मध्यप्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले “मध्य प्रदेशची दतिया विधानसभा ही काँग्रेसचीच होती, ती जिंकण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला, पण तरीही काँग्रेसने ती जागा जिंकली. हे फार मोठी क्रांती झाली असे मी म्हणणार नाही, पण लोकांचा कल दिसत आहे. मोदी आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता किती खाली घसरली आहे, हे तुमच्या बालेकिल्ल्यातील पराभवातून स्पष्ट दिसत आहे.” अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय
बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. या मतदारसंघातून भाजपचे नेते नितीन नवीन यांनी २०१० पासून २०२५ अशा सलग चार विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. त्याआधी त्यांच्या वडिलांनी, नबीन किशोर सिन्हा यांनी १९९५ पासून सलग चार वेळा आमदार राहिले होते. त्यामुळे बांकीपूरवर भाजपचे वर्चस्व कायम राहिले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपच्या या मजबूत गडाला मोठा धक्का देत विजय संपादन केला आणि आपल्या राजकीय प्रवासाची दमदार सुरुवात केली आहे.






