“मी असतो तर कानाखाली लगावली असती”; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; पहा व्हिडीओ
मुंबई : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे भर पत्रकारपरिषदेत राणेंकडून असे केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केले आहे.
रायगडमधील महाड येथे आज केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असं राणे म्हणाले आहेत. या पत्रकारपरिषदेस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती.
“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
तसेच, तेल शुध्दीकरणाचा प्रकल्प कोकणातच व्हायला हवा असे मत केंद्रीय लघु सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केले. ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला. पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष रखडले आहे. ज्यांनी कामे घेतली त्यांनी ती पूर्ण केली नाहीत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदूर्ग जिल्ह्यासोबतच रस्त्याच्या कामाला सुरवात झाली. सिंधुदूर्गातील काम पूर्ण झाले. पण इथे काम झाले नाही. त्याला ठेकेदार आणि ज्यांनी ठेका मिळवून दिला ते जबाबदार आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांची भेट घेणार त्यांना सर्व ठेकेदारांची कामे काढून घेऊन नवीन ठेकेदार नेमावेत अशी विनंती करणार आहे. नवीन ठेकेदारांकडून सात ते आठ महिन्यात रस्ते पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.





