पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे. मावळ गोळीबार प्रकरणावरून भाजपने अजित पवारांना लक्ष केले होते. दरम्यान, मावळ गोळीबाराला मी जबाबदार असेल किंवा त्यात माझा संबंध असेल तर मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावेन, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते पुण्यात काँग्रेस भवनात आयोजित सभेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, मावळ गोळीबाराला मी जबाबदार असेल किंवा त्यात माझा संबंध असेल तर मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावेन. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात कोणत्याही अधिका-याने जर सांगितलं की गोळीबाराचे आदेश मी दिले होते आणि असं खर ठरलं तर अजित पवार राजकारणातून निघून जाईल.
मी माझी पुर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहे, माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत ,या प्रकरणात मी माझी कारकीर्द जेवढी पणाला लावेन तितकी भाजपा मधील नेता लावणार का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच मी एक शेतक-याचा मुलगा आहे आणि जीवात जीव आहे तोपर्यंत शेतक-या विरोधात कोणतही काम होणार नाही, असेहीं ते म्हणाले.
काय केली होती भाजपने टीका ?
मावळ गोळीबार प्रकरणावरून भाजपने अजित पवारांना लक्ष केले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना ९ ऑगस्ट २०११ ला मावळमध्ये आंदोलन करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले, कित्येक शेतकरी गोळीबारात जखमी झाले! हे महाराष्ट विसरला नाही, असे भाजपने म्हटले होते. तसेच शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते ?, असा प्रश्न देखील भाजपने उपस्थित केला होता.
मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार महाराष्ट्र विसरला नाही- भाजप