मुंबई – “ज्यांना सर्व काही दिले तेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून गेलेत. ते पवारांवर आता “वार’ करत आहेत. आम्हाला काही मिळाले नाही. पण त्यानंतरही आम्ही आमच्या बापासोबत कायम राहणार आहोत. त्यांना एकटे सोडणार नाही,’ असे भावूक उद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी काढले आहेत. ते मुंबईत बोलत होते.
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट सत्ताधारी शिवसेना-भाजप आघाडीला जावून मिळाला आहे. यामुळे पक्षात दोन उभे गट पडलेत. या प्रकरणी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.
आव्हाड यावेळी म्हणाले की, मी शरद पवार यांना कधीही न सोडणारा माणूस आहे. 9 आमदार सोडून सर्व आमदार हे आमच्यासोबत आहेत. हे सर्वकाही स्वार्थापोटी सुरू आहे. आम्हाला 35 वर्षात काहीच मिळाले नाही. त्यानंतरही मी माझ्या बापासोबत कायम आहे. ज्यांना 35 वर्षांत खूपकाही मिळाले, तेच आता शरद पवार यांना सोडून गेलेत, असे ते म्हणाले.
“शरद पवार हे अशा अनेक लढाया लढले आणि जिंकले आहेत. मंत्रालयात बसलेल्या लोकांना शरद पवारांनी मोठे केले. मी याचा साक्षीदार आहे. शरद पवारामुळेच सर्वांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आले. त्यांनी पवारांची साथ सोडली. यामुळे मी भावूक झालो आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे महाराष्ट्राला माहिती आहे,’ असेही आव्हाड यावेळी म्हणाले.