औरंगाबाद: सध्या राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातलंय, तर दुसरीकडे राजकीय मंडळी सत्तास्थापनेची गणितं जुळवण्यात व्यस्थ आहेत. राज्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादला आले होते. त्यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेंव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मी पुन्हा येईन या घोषणेची खिल्ली उडवली आहे.
ठाकरे म्हणाले की, पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीए. पाऊस जाताना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणतोय. यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. यावेळी राज्यातील सत्तेचा तिढा केव्हा सुटेल, यावर थेट भाष्य करणं त्यांनी टाळलं. शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण सत्ता स्थापनेचा विचार करणार असू तर आपण निर्घृण आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच मला शेतीतलं फारसं कळत नाही. पण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय अपुरी असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. ‘शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या. यातून तो पुढच्या हंगामाची तयारी करू शकेल. शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक बाबींचा फारसा विचार करू नका. बळीराजाला माणुसकीच्या नात्यानं मदत करा आणि मग निकषांच्या फुटपट्ट्या लावा,’ असंदेखील ते पुढे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा. यासाठी प्रशासनानं कागदी घोडे नाचवू नयेत, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.
दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ‘मी पुन्हा येईन’ कविता सादर केली होती. त्यानंतरच्या अनेक सभांमध्येही फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.