Bhagyashree: “शॉवरखाली बसून खूप रडायचे…”; भाग्यश्रीने सांगितला पेरिमेनोपॉजचा त्रास
Bhagyashree पेरिमेनोपॉज हा प्रत्येक महिलेसाठी वेगळा अनुभव असू शकतो. काही महिलांना सौम्य लक्षणं जाणवतात, तर काहींना त्याचा दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा काळात शरीरात किंवा मनात जाणवणारे बदल दुर्लक्षित न करता गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Bhagyashree: ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच भाग्यश्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित माहितीही शेअर करत असते. आता तिने महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याबद्दल म्हणजेच पेरिमेनोपॉजबद्दल स्वतःचा अनुभव सांगितला आहे.
मासिक पाळी कायमची थांबण्याआधीचा काळ म्हणजे पेरिमेनोपॉज. या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे काही महिलांना मूडमध्ये अचानक बदल, झोपेचा त्रास, गरम होणे, घाम येणे आणि थकवा अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. भाग्यश्रीनेही या काळात स्वतःला अशाच अनेक त्रासांचा सामना करावा लागल्याचं सांगितलं.
भावनांवर नियंत्रण ठेवणं झालं कठीण
भाग्यश्रीने सांगितलं की, पेरिमेनोपॉजच्या काळात तिच्या भावनांमध्ये अनेक बदल जाणवत होते. कधी अचानक खूप रडावंसं वाटायचं, तर कधी मूडमध्ये मोठे बदल व्हायचे. या भावनिक चढ-उतारांचा तिच्या रोजच्या आयुष्यावरही परिणाम झाला.
या काळात जेव्हा तिला खूप रडू यायचं, तेव्हा ती अनेकदा शॉवर घ्यायची. दिवसातून चार-पाच वेळाही ती अंघोळ करत असल्याचं तिने सांगितलं. शॉवरखाली काही वेळ शांत बसून रडल्याने तिला मन हलकं झाल्यासारखं वाटायचं. पाण्यामुळे मनातील नकारात्मक भावना दूर होत असल्याचा अनुभव तिला येत होता. त्यामुळे तणाव वाढला किंवा रडू आलं की ती अंघोळीला जायची, असं भाग्यश्रीने सांगितलं.
हॉट फ्लॅशेस आणि झोपेचा त्रास
पेरिमेनोपॉजच्या काळात भाग्यश्रीला हॉट फ्लॅशेसचाही त्रास झाला. अचानक शरीर गरम होणे आणि रात्री मोठ्या प्रमाणात घाम येणे यामुळे तिची झोप वारंवार खराब होत होती. रात्री घामामुळे कपडे आणि बेडशीट भिजून जायचे. त्यामुळे झोपताना अतिरिक्त कपडे आणि बेडशीट जवळ ठेवण्याची वेळ तिच्यावर आली होती. सतत झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवाही जाणवत होता.

Bhagyashree
‘माइंड फॉग’चा अनुभव
या काळात भाग्यश्रीला विसरण्याचाही त्रास जाणवला. एखाद्या कामासाठी खोलीत गेल्यानंतर तिथे नेमकं कशासाठी आले होते, हेच विसरल्याचे अनुभव तिने सांगितले. बोलताना योग्य शब्द आठवण्यात अडचण येणे किंवा लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे, यालाही ‘माइंड फॉग’ म्हटलं जातं. भाग्यश्रीने पेरिमेनोपॉजच्या काळात असा अनुभव आल्याचं सांगितलं.
आरोग्य आणि आहाराकडे दिलं लक्ष
या त्रासांचा रोजच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागल्यानंतर भाग्यश्रीने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. तिने व्यायाम, योग आणि ध्यानधारणेवर भर दिला. तसंच सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हात फिरण्याची सवय लावून घेतली. आहारात कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला. डाळिंबाचा रस आणि हिबिस्कस चहाचाही ती आहारात समावेश करत असल्याचं तिने सांगितलं.
पेरिमेनोपॉज हा प्रत्येक महिलेसाठी वेगळा अनुभव असू शकतो. काही महिलांना सौम्य लक्षणं जाणवतात, तर काहींना त्याचा दैनंदिन जीवनावर अधिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा काळात शरीरात किंवा मनात जाणवणारे बदल दुर्लक्षित न करता गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, भाग्यश्री नुकतीच रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिने राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली आहे.





