मुंबई – सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता. सचिन वाझेचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता, असं फडणवीस यांनी म्हटलं.
पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरेन यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत. मात्र मूळ प्रश्न आहे तो एपीआय सचिन वाझेंना सेवेत का घेतलं. माझ्याही सरकारच्या काळातही वाझे यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव आला होता. पण, महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तो प्रस्ताव आम्ही नाकारल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सचिन वाझे हे शिवसेनेत होते, प्रवक्ते होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहे. हायकोर्टाच्या आदेशाद्वारे निलंबित असताना सुद्धा, कोरोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना सेवेत घेतले गेले. सचिन वाझे यांना घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्ती का दिली, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.
दरम्यान वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले. मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट आणि सार्यांचे प्रमुख सचिन वाझे असल्याचा दावा फडणवीसांनी केला.