नवी दिल्ली – देशातील करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ८६४९८ नव्या बाधितांची नोंद झाली. देशात बाधितांची संख्या शिखरावर असतानाच्या आकडेवारीपेक्षा गेल्या २४ तासांमधील बाधितांचा आकडा ७९ टक्क्यांनी कमी आहे. असं असलं तरी करोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे.
देशात दुसरी लाट हाहाकार माजवत असतानाच काही तज्ज्ञांनी करोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक ठरेल असे भाकीत केले होते. करोनाची तिसरी लाट येण्याबाबत तज्ज्ञांचे एकमत असले तरी बालकांसाठी ती धोकादायक ठरू शकते का? याबाबत तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे असल्याचं पाहायला मिळालं.
अशातच आज, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे.
“भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचे दिसून आलेले नाही. दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या बालकांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली तसेच काही बाधित बालकांना इतर आजार असल्याचं दिसलं. यापुढेही बालकांमध्ये करोनाचा गंभीर संसर्ग आढळून येईल असं मला वाटत नाही.” असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला.
दरम्यान, देशातील करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र विषाणू संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव गाठीशी असल्याने नागरिकांनी विषाणू संदर्भातील सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येतंय.