सांगली – गेली २० वर्ष राजकारणात सहभाग असल्याने मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच दिवास्वप्न नाही तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न साकार करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणे ही इच्छा प्रत्येकाचीच असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचे संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तरुणांना सल्ला देताना जयंत पाटील म्हणाले कि, जर राजकारणात यायचे असेल तर फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. जनतेत उतरून काम करावे लागेल, असा सल्ला त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेवेळी उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांचेही नाव चर्चेत होते. परंतु, अखेर उपमुख्यमंत्रिदी अजित पवार विराजमान झाले.