भाष्य : स्वप्निल श्रोत्री
पुढील वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय होईल ते आताच सांगता येत नाही. परंतु, जर “अब की बार, ट्रम्प सरकार’ आले तर आपल्या दुसऱ्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प भारताच्या पारड्यात कृतज्ञतेचे दान टाकतील अशी अपेक्षा करणे काही गैर नाही. गेली अनेक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील बहुचर्चित “हाऊडी मोदी’ कार्यक्रम रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत ह्यूस्टन येथे पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी “न्यू-इंडिया’चा नारा दिला तर उभय देशांच्या प्रमुखांनी दहशतवाद विरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करीत अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला चपराक दिली.
अमेरिकेतील भारतीय पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे जगात सर्वत्र कौतुक तर झालेच शिवाय भारत-अमेरिका संबंधाला आलेल्या मजबुतीचे संपूर्ण जगाला दर्शन झाले. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्टर्न इकॉनॉमिक फोरमसाठी रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात जाऊन भारत-रशिया संबंध अतूट असल्याचा संदेश देऊन आले तर रविवारी अमेरिकेत जाऊन भारत-अमेरिका मैत्री घट्ट असल्याचे सांगून आले. जगातील 2 परस्परविरोधी असलेल्या महासत्तांशी घनिष्ट संबंध ठेवण्याची किमया फक्त भारतीय परराष्ट्र धोरणात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची स्वातंत्र्यापासूनच प्रमुख 3 उद्दिष्टे आहेत.
1) पाकिस्तान व चीन यांच्यासोबतचे प्रलंबित प्रश्न सामंजस्याने सोडविणे.
2) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान मिळविणे.
3) आशिया खंडातील महासत्ता म्हणून पुढे येणे.
ही 3 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारताला अमेरिकेशिवाय पर्याय नाही. अमेरिका ही एक अशी महासत्ता आहे जी स्वतःच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी एखाद्या राष्ट्राच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप करू शकते आणि वेळप्रसंगी संपूर्ण जगाचा विरोध डावलून लष्करी कारवाईसुद्धा करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेने इराकवर केलेली लष्करी कारवाई.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जग 2 महासत्तांमध्ये विभागले गेले होते. एक गट अमेरिकेचा होता तर दुसरा गट सोव्हिएत रशिया (यूएसएसआर)चा होता.
जागतिक राजकारणावर आपली पकड मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने चाललेला हा दोन महासत्तांमधील संघर्ष चरम सीमेवर असतानाच 1991 साली सोव्हिएत रशियाचे 15 राष्ट्रांत विभाजन झाले आणि हा संघर्ष मिटला. तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेच्या एकछत्री अंमलाला आव्हान देणारा स्पर्धक उरला नव्हता. मात्र, आता चीन महासत्ता बनू पाहात आहे. अमेरिकेला हटवून अमेरिकेची जागा घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे चीनच्या वाढत्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत-अमेरिका संबंधात बरीच सुधारणा झाली आहे. पूर्वीसारखे कडवट असलेले संबंध आता राहिलेले नाहीत.
याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेमध्ये स्थायिक असलेले भारतीय लोक. जवळपास 30 लाख भारतीय आज अमेरिकेत राहात असून त्यांनी अमेरिकेच्या विकासात व भारत-अमेरिका संबंधात सुधारणा करण्यात मोठा वाटा उचललेला आहे. त्याचप्रमाणे भारताचे वाढते लष्करी सामर्थ्य, वाढता आर्थिक विकासदर आणि आशिया खंडातील भारत असलेली मोठी बाजारपेठ या कारणांमुळे अमेरिकेला भारताबरोबरच्या संबंधात सुधारणा करणे गरजेचे वाटले. संरक्षण क्षेत्रात अमेरिकेची भारताबरोबरील आघाडी वादातीत असून 2016 मध्ये अमेरिकेने भारताला “मुख्य संरक्षक भागीदार’ असा दर्जा दिलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून भारताला एस. टी. ए.- 1 च्या यादीत टाकण्यात आलेले आहे. याचा परिणाम म्हणजे आता भारताला अमेरिकेकडून संरक्षण साहित्याबरोबरच तंत्रज्ञानसुद्धा आयात करण्यास सोपे होणार आहे.
2002 आणि 2016 मध्ये झालेला करार भारत-अमेरिका संरक्षण संबंधात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या करारानुसार भारत-अमेरिकेची बंदरे व बेटे आपल्या संरक्षण व लष्करी कामासाठी वापरू शकतो व अमेरिकासुद्धा भारताची बंदरे व बेटे आपल्या संरक्षण व लष्करी कामासाठी वापरू शकते. मात्र, युद्धाच्या काळात हा करार दोन्ही देशांवर बांधील नसेल. त्याचबरोबर भारताने अमेरिकेकडून घेतलेले सी- 130 जे हर्क्यूलिस विमान, सी- 17 क्लोब मास्टर विमान, आपाचे हेलिकॉप्टर व नुकतीच आयात केलेली एम- 777 होविट्झर तोफ रडार प्रणाली भारताच्या संरक्षणात मोलाची भर घालीत आहेत. अमेरिकेची मुख्य अवकाश संघटना असलेल्या नासाचे सुद्धा भविष्यात इस्रोबरोबर अनेक सामायिक प्रकल्प असून दोन्ही राष्ट्रांमधील विश्वास पूर्ण संबंधांचे हे प्रतीक आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हाऊडी मोदी हा कार्यक्रम वैयक्तिकरित्या सुद्धा महत्त्वाचा होता. कारण, पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ट्रम्प यांना अमेरिकेतील 30 लाख भारतीयांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचा इतिहास पाहता त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कायम डेमोक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे; परंतु ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे असल्यामुळे मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून मोदींकडून आपला प्रचार करून घेणे ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचे होते.