‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले? जाणून घ्या…

Operation Sindoor: भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित कश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनी दहशतवादाला जबरदस्त हादरा दिला आहे. या कारवाईत 90 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराने मंगळवारी मध्यरात्री 1:45 वाजता ही कारवाई सुरू केली. या हल्ल्यात लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 9 तळांचा पूर्णपणे नायनाट करण्यात आला.
रक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोटली, बहावलपुर, मुर्दिके आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवादी केंद्रांवर अचूक मिसाईल हल्ले करण्यात आले. विशेषतः मुर्दिके येथे 30 दहशतवादी ठार झाले, तर इतर तळांवरही मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झाला. राफेल आणि सुखोई-30 लढाऊ विमानांनी ब्रह्मोस आणि स्कॅल्प मिसाइल्सच्या साहाय्याने ही कारवाई केली.
या ऑपरेशनदरम्यान कोणत्याही पाकिस्तानी सैन्य तळाला किंवा नागरी वस्त्यांना हानी पोहोचली नाही, याची काळजी घेण्यात आली. भारतीय सैन्याने आपली कारवाई केवळ दहशतवादी ठिकाणांपुरती मर्यादित ठेवली, ज्यामुळे भारताच्या संयम आणि रणनैतिक परिपक्वतेचं प्रदर्शन झालं.
पाकिस्तानात या हल्ल्यांमुळे खळबळ उडाली असून, तिथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराने 8 नागरिकांचा मृत्यू आणि 33 जण जखमी झाल्याचा दावा केला आहे, परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचं रात्रभर निरीक्षण केलं. दहशतवादाविरुद्ध भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाला या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत या ऑपरेशनची यशस्विता आणि रणनीती उलगडली.





