नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर आणि त्यांना नियंत्रित करण्यात नागरी अधिकाऱ्यांच्या कथित कमतरतांवर प्रकाश टाकणाऱ्या याचिकांवर लक्ष केंद्रित केले. सुनावणीदरम्यान, वरिष्ठ वकील सीयू सिंह यांनी युक्तिवाद केला की, दिल्लीलाही उंदीर आणि माकडांचा धोका आहे. जर कुत्रे अचानक नाहिसे केले तर काय होईल? उंदरांची संख्या वाढते. कुत्रे संतुलन राखतात. त्यांच्या युक्तिवादावर प्रतिक्रिया देताना न्या. संदीप मेहता यांनी टिप्पणी केली, कुत्री, मांजरी, उंदीर त्यांच्यात काही संबंध आहे का? आपण मांजरींना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण ते उंदरांचे शत्रू आहेत. आम्ही रस्त्यावरील प्रत्येक कुत्र्याला हटवण्याचे निर्देश दिलेले नाहीत. त्यांच्याशी नियमांनुसार वागणूक दिली पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. न्या. विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. दरम्यान, खंडपीठाने आपल्या पूर्वीच्या निर्देशाचे स्पष्टीकरण देत, रस्त्यावरून प्रत्येक भटक्या कुत्र्याला हटवण्याचे आदेश दिले नव्हते यावर भर दिला.