जळगाव – “तुमचे सरकार आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्हाला न विचारता पोलिस लाठीचार्ज करत असतील तर तुम्हाला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला न विचारता लाठीचार्ज झाला तर तुम्ही सरकारमध्ये काय करताय?’ असे सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जालना जिल्ह्यातील लाठीचार्जवरून करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
पाटील पुढे म्हणाले की, पोलिस तुम्हाला न विचारता शांततेत चाललेल्या आंदोलकांना मारहाण करत असतील तर सरकार म्हणून तुम्ही काय करता? तसेच, तुमचे हे चॅलेंज म्हणजे महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही न पटणारे आहे, असे म्हणत अजित पवार यांच्या आव्हानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारने इतर कार्यक्रम बाजूला ठेवून दुष्काळसंदर्भात उपाय योजना केल्या पाहिजेत. शिर्डीत शासन आपल्या दारीसाठी नगर जिल्ह्यातील सर्व एसटी बस बुक करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी नाही, अशी परिस्थिती होती.
जळगावमध्ये कार्यक्रमाला या, नाही तर तुम्हाला रेशनचे धान्य मिळणार नाही,असे फर्मानच काढण्यात आले होते. सरकारी पक्षाला माणसे गोळ्या करण्यासाठी अनेक उपदव्याप करावे लागतात, हे दिसते आहे, असेही पाटील यांनी पुढे म्हटले.