Mamata Banerjee | modi government – देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याच्या दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामावरून मोठ्या वादाचे केंद्र बनले आहे. या धावपट्टीच्या बांधकामात एक मशीद येते आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही मशिद म्हणजे गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. कोलकाता विमानतळाची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याच्या उद्देशाने आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणांची वाढती संख्या पाहता, दुसऱ्या धावपट्टीची तातडीने आवश्यकता आहे. तथापि, मशिदी हटवण्याबाबत राज्य सरकारकडून एएआयला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, भाजपनेही या मुद्द्यावर ममता बॅनर्जी सरकारला घेरले आहे. भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि ममता बॅनर्जी सरकारवर तुष्टीकरणाचा आरोप केला. भाजपचे म्हणणे आहे की राज्य सरकार राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रवाशांच्या जीवनापेक्षा धार्मिक भावनांना प्राधान्य देत आहे आणि हे एक बेजबाबदार पाऊल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्य केले आहे की, दुसऱ्या धावपट्टीजवळ असलेली मशीद सुरक्षित ऑपरेशनमध्ये अडथळा आणते, ज्यामुळे धावपट्टीचा उंबरठा ८८ मीटरने सरकतो.