राज्य शासनाकडून स्पष्टीकरण
पुणे – करोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाज माध्यमावरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तुतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
काय आहे खोट्या परिपत्रकात…
खोट्या परिपत्रकात महाराष्ट्र, गुजरात, सिक्किम आणि उत्तर प्रदेशमध्ये 14 ते 21 मार्च दरम्यान शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शाळा बंद न ठेवल्यास 5000 दंड होईल, असा इशारा दिला आहे. हे पत्र व्हायरल होताच अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या परिपत्रकाबद्दल राज्य शासनाने केंद्राकडे विचारणा केली. त्यावर अशा स्वरूपाचे पत्र काढण्यात आले नाही, असे सांगण्यात आले.