Devendra Fadnavis : अयोध्येत राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापणेचा सोहळा काही तासांतच सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू होणार आहे. नुकतेच मोदी या कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा बहुप्रतिक्षित होता. या सोहळ्याकरता अवघ्या देशाचं लक्ष लागून होतं. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्याकरता हा अतिशय भावनिक दिवस आहे. कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो, गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवले आहे. असा क्षण याची देहि याचा डोळा बघायला मिळणं हा रामाचा आशीर्वादच आहे.”
पुढे ते म्हणाले, “आमचा नारा होता रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाएंगे६ डिसेंबर १९९२ बाबरीचा ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झाले. त्यानंतर आमचा नारा होता रामलल्ला हम आयेंगे, मंदिर भव्य बनाऐंगे. आता हे मंदिर तयार झालं असून प्राणप्रतिष्ठा होत आहे. केवळ कारसेवक नाही, तर कोट्यवधी हिंदूंकरता हा ऐतिहासिक दिवस आहे. आजपासून भारताची नवीन अस्मिता सुरू होत आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शेफ विष्णू मनोहर आज जगदंबा संस्थान कोराडी येथे ६ हजार किलोचा महाप्रसाद तर अयोध्येत २६ जानेवारीनंतर ७ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहेत. त्यानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला.