प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जागतिक दर्जाच्या हिंजवडी आयटीपार्कच्या कुंपणावर दरवर्षीच नागरिकांना बिबट्याचे दर्शन होते. आतापर्यंत कधीही कुठलीही मनुष्यहानी झाली नसली तरी डोंगरभाग व जंगल परिसरात वास्तव्यास असलेल्या बिबट्याने यापूर्वी पाळीव प्राण्यांना भक्षक केल्याने नेरे, जांबे , मारुंजी, कासारसाई परिसरातील ग्रामस्थ तसेच सोसायट्यामध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे कालांतराने नागरिकांना निसर्गाच्या कुशीत वन्य पशू असलेल्या बिबट्याचे दर्शन होत आहे.बुधवारी ( दि. १२) नेरे येथील डोंगर पायथ्याला उभारलेल्या एक्झरबिया सोसायटीतील नागरिकांना त्याचे दर्शन झाले. अनेकांनी त्याचे फोटो व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु डोंगरावरील पाणी संपले असल्याने तो मानवी वस्तीकडे पाण्याची तहान भागविण्यासाठी आला असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गेल्या पाच सहा वर्षांपासून मुळशी तालुक्याच्या जंगली व उसाची शेती असलेल्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. तो कधी एकटा तर कधी आपल्या पिल्लासह वेगवेगळ्या गावात वाड्यावस्त्यावर वावरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.दरम्यान सोसायटी धारकांना बुधवारी बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर मुळशीच्या वन विभागाने तत्काळ नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. लोकांमध्ये सुरक्षे विषयी जनजागृती केली असून रात्री बाहेर पडताना काय काय काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बिबट्यांच्या वाढता वावर पाहून सापळा लावण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जंगली प्राण्यांचा अधिवास हा वनक्षेत्रातच असतो. जोपर्यंत त्याला जंगलात शिकार मिळते. तोपर्यंत तो मानवी वस्तीत येऊन माणसावर हल्ला करत नाही. कधी कधी पाण्याच्या शोधात तो मानवी वस्तीकडे येतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. तो सातत्याने लोकवस्तीत आढळला असता तर त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची कार्यवाही केली असती. परंतु तो नेरे येथील जंगलात वावरताना दिसला आहे. त्यामुळे नागरीकांनी दक्षता घेत सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे. -प्रताप जगताप,वन अधिकारी मुळशी सिमेंटच्या जंगलामुळे वन विभागही संभ्रमात.. बिबट्याचा वावर कधी डोंगर भागात,जंगलात, झाडी झुडपात तर कधी ऊसाच्या शेतात असल्याने नेरे, जांबे की कासारसाईला पिंजरा लावायचा याबाबत वन कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कधीतरी रात्री अपरात्री तो मनुष्यवस्तीत देखील आढळतो. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात डोंगर पायथ्याला सिमेंटचे जंगल उभारलेल्या ठिकाणी तो आढळणारच. त्यामुळे सरकारनेच डोंगरपायथ्याशी होणाऱ्या बांधकामाना आळा घालावा व वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासात मुक्तपणे संचार करण्याची मुभा द्यावी अशी मागणी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव यांनी केली आहे.