हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – सकाळी ४-५ वाजता उठून घरकाम, स्वयंपाकपाणी, पुरुषांना जेवण देऊन नंतर शेवटी आपण खायचे, नंतर पुन्हा दुपारची न्ह्याहारी घेऊन शेतात जायचे आणि घरच्या पुरुषांच्या बरोबरीने काबाडकष्ट करायचे. सायंकाळी पुन्हा घरकाम, स्वयंपाकपाणी…. असे संघर्षमय जीवन ग्रामीण भागातील मायमावल्या जगत असतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे सध्या शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने, सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील एका महिलेने शेतातील नियमित कामच काय, हातात रुमने धरून दिवसभर कोळपणी केली आणि घरच्या पुरुष मंडळींच्या खांद्याला खांदा लावून महिलांच्या अंगी असलेल्या करारी बाण्याचे दर्शन घडविले.
सध्या 400 ते 500 रुपये देऊन सुध्दा कामगार मिळत नाहीत. असे असतानाही अनेक भागात शेतात काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांची वानवा आहे. अशीच स्थिती हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा भागात सुद्धा आहे. सध्या कोळपणी, डवरणीच्या कामावर मजूर मिळणे अवघड झाले आहे. सध्या पाऊस थांबला आहे. पाऊस परतण्यापूर्वी शेतातील कामे उरकून घेण्यासाठी, कामात खंड नको म्हणून मीनाक्षी शरद निरगुडे या महिलेने घरच्या पुरुष मंडळींच्या खांद्याला खांदा लावून आज दिवसभर डवरणीचे काम केले.
शहरी भागात अनेक जणांना आणि त्यातही महिला वर्गाला डवरणी काय आहे हेच माहिती नसते. मॉर्निंग, इव्हिनिंग वॉक करताना 500 मीटर चालल्यावर आपण घामाघूम होऊन थकून जातो. असे वॉक दिवसभर करताना, किती घाम निघत असेल, किती थकवा येत असेल याची कल्पना न केलेली बरी. अशीच स्थिती ग्रामीण भागातील बहुतांश महिलांच्या वाट्याला थोड्याफार फरकाने येत असते. हंगामात राबराब राबून शेवटी काय ते निसर्गाच्या हाती. असे असतानाही चांगले दिवस येतील या आशेवर हा वर्ग जगत असतो.