हिंगोली: नरसी नामदेव येथे परतवारी उत्साहात! एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले संत नामदेव महाराजांचे दर्शन

हिंगोली : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारी एकादशी निमित्त सोमवारी (दि. २१) पहाटेपासून भाविकांचा महासागर लोटला. सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे दीड लाखांहून अधिक भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. शेकडो दिंड्यांसह आलेल्या भाविकांनी “रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “हरी नाम”च्या जयघोषात नरसीला प्रती पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे दर्शन घेतल्यानंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामीका एकादशीला भाविक नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येतात. या दर्शनानंतरच वारी पूर्ण मानली जाते, म्हणूनच या वारीला ‘परतवारी’ असे संबोधले जाते. दरवर्षी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. यंदाही भाविकांचा उत्साह आणि गर्दीने नरसी नामदेव येथे अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले.
चोख व्यवस्था, भव्य मंडप आणि साबुदाणा खिचडीचे वाटप –
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थान प्रशासन, पोलिस आणि महसूल प्रशासनाने चोख व्यवस्था केली. रविवारी (दि. २०) मध्यरात्री १२:३० वाजेपासूनच भाविक दर्शन रांगेत उभे होते. गर्दी वाढल्यानंतर पहाटे २:३० वाजता दर्शनाला सुरुवात झाली. तीन रांगांद्वारे भाविक मंदिरात प्रवेश करत होते. याशिवाय, चार भव्य मंडप उभारण्यात आले, तसेच विविध संघटनांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. व्यापारी ओम हेडा यांच्यावतीने १०० क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. भाविकांच्या वाहतुकीसाठी हिंगोली, परभणी, जिंतूर, रिसोड आणि वसमत आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या.
महापूजा आणि मान्यवरांची उपस्थिती –
सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे आणि संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, भिकाजी कदम, भिकुलाल बाहेती, ओम हेडा, द्वारकादास सारडा, मनोज आखरे, ब्रिजमोहन तोष्णीवाल, राहुल नाईक यांच्यासह विश्वस्त आणि असंख्य भाविक उपस्थित होते.
नरसीत प्रती पंढरपूरचे दृश्य –
भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे नरसी नामदेव येथे प्रती पंढरपूर अवतरल्याचे चित्र दिसून आले. मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नरसीच्या परिसराला उत्सवी रंग चढवला. परतवारी एकादशीच्या या सोहळ्याने संत नामदेव महाराजांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा महिमा पुन्हा एकदा अधोरेखित केला.





