हिंगोली – शेतात काम करत असताना अंगावर विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे शनिवारी (दि. 30) घडली. नागनाथ दत्तराव पायघन (वय 35) असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून सततधार पाऊस पडत आहे. आज सकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी नागनाथ पायघन शेतात काम करत होते. शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी अंगावर विज पडून नागनाथ यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सेनगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.