मुंबई – भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अनेकदा फसवणूक केली आहे, पण मी फसणारा नाही. त्यांच्या सर्व बारीकसारीक हालचालींवर माझे लक्ष आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मी डोळे आणि कान उघडे ठेवतो. मी भाजपला चांगला ओळखून आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काल हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले, महाराष्ट्रातील हिंदू भाजपने चालवलेल्या हिंदुत्वाच्या धोरणात अडकू शकत नाहीत. भाजप अशा प्रकारे वागत आहे की जणू राज्यातील जनता त्यांनाच पर्याय म्हणून शोधत आहे. भाजप-शिवसेना युती केवळ हिंदुत्वाच्या नावावर टिकून होती याची आठवण मुख्यमंत्र्यांनी भाजपला करून दिली. “शिवसेनेने 1987 मध्ये हिंदुत्वाच्या नावावर पहिली निवडणूक विलेपार्ले येथून लढली आणि जिंकली. त्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केला होता असे ते म्हणाले. शिवसेना हिंदुत्वाच्या आधारावर निवडणूक लढवत असताना, भाजपने शिवसेनेला विरोध करून उमेदवार उभा केला, पण शिवसेनेने निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचे नेते बाळासाहेब ठाकरेंकडे हिंदुत्वाच्या आधारे युती करण्यासाठी आले, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवरच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. मनसेवर निशाणा साधत ते म्हणाले, “हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करण्यासाठी नवे खेळाडू आले असले तरी ते इतक्या सहजासहजी त्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यांचा खेळ कधी मराठीपणासाठी सुरू होतो तर कधी हिंदुत्वाशी. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे नाटक-मनोरंजन बंद होते, पण ते पुन्हा सुरू झाले आहे. त्यांचे झेंडेही बदलले आहेत, अशी टीकाही उद्वव ठाकरे यांनी केली.