कापूरहोळ- पुणे-सातारा महामार्गवर वरवे (ता. भोर) गावच्या हद्दीत एका चालत्या ट्रकने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचे इंजिन गरम झाल्याने ट्रकने पेट घेतला, असा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावरून हा ट्रक प्लास्टिक हेल्मेटची वाहतूक करत होता. पुण्याच्या बाजूने साताराकडे जात असताना वरवे गावच्या हद्दीत सकाळी 10.45 च्या सुमारास अचानक चालत्या ट्रकचे इंजिन गरम झाल्याने पेट घेतला.
त्यामुळे आग लागल्याचे वाहन चालकाचे लक्षात आले. त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन उभा केला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की ती विझविण्यासाठी वेळच मिळाला नाही. 15 ते 20 मिनिटात ट्रक जळून खाक झाला. गाडीचे टायर फुटून मोठा आवाज झाला. ट्रक आणि गाडीतील माल जळून खाक झाला. यावेळी वाहनांची गर्दी झाल्यामुळे आग विझविण्यासाठी स्थानिक व इतर वाहन चालकांना वाव मिळाला नाही.
पुणे- सातारा महामार्गावर उद्या रविवारी सुट्टी असल्याने दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वहातुक सुरू होती. घटनास्थळी राजगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिस वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत होते.
दरम्यान महामार्ग पोलिस व राजगड पोलिसांनी पुढील कार्यवाही तातडीने सुरू केली आहे. टोल नाक्यापासून साधारण तीन चार किलोमीटर वर घटना घडली आहे. टोलनाक्यावर तातडीने आग विझवण्यासाठी यंत्रणा नाही जर अस्तीतर आग विझविण्यासाठी त्याचा वापर झाला असता अशीच घटना 11 रोजी सारोळा गावच्या हद्दीत घडली होती. एकाच महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे महामार्ग वरील सुरक्षित वहातुक प्रश्न उपस्थित होत आहे.