मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मराठवाडा, कोकणातील अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने ढगाळ हवामान तयार होते. त्यानंतर अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळायला सुरुवात झाली होती. अशातच वातावरणातील बदलांमुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारीही ढगाळ नोंदविण्यात आले. विशेषत: सकाळसह दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी तुरळक सरींनी हजेरी लावली. विशेषत: येथील ढगाळ हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून, 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसांत निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.