रायगड: राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धोका पाहता किनाऱ्यालगतच्या गावांसाठी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
भिरा टाटा पॉवरमधून सोडलेल्या पाण्याने तयार होणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळी धोका पातळीजवळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. तसेच, अधिकारी वर्गाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
17 जून रोजी रात्री 10 वाजता केलेल्या निरीक्षणानुसार रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची धोक्याची पातळी डोलवहाल बधांऱ्यावर 23.95 मीटर इतकी आहे. सध्याची पातळी पाणी 22.23 मीटर आहे. तर या ठिकाणी ईशारा पातळी 23.00 मीटर आहे.