पुणे – जिल्ह्याच्या दक्षिण भागावर दाट ढगांची गर्दी जमली असून, या भागात गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे ही स्थिती लक्षात घेत हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तसेच मध्यपूर्व अरबी समुद्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यात पुण्यसह कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, नंदुरबार, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, लातूर जिल्ह्यांत काही भागात कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 13 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य भागापासून ते आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज आहे.