पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढणारा उन्हाचा चटका आगामी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तर उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्यात झपाट्याने वाढ झाली. एक-दोन दिवसांतच अनेक शहरांतील तापमानाने चाळिशी ओलांडली होती. सध्या कमाल आणि कमाल तापमानात चढ-उतार होत असले, तरी उन्हाचा चटका कायम आहे. किमान तापमानातील वाढीमुळे रात्रीचा उकाडा हैराण करतो आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच ठिकाणी सध्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रातही तापमानातील वाढ कायम आहे.
देशामध्ये सध्या राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. तर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, परभणी, सातारा, धुळे, जळगाव, नांदेड, बीड, यवतमाळ या जिल्ह्यांतील तापमानात मोठी वाढ नोंदविली जात आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सध्या निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण झाली आहे. 3 व 4 एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुण्याचा पाराही चढताच
पुण्यातही तापमानाचा पारा मंगळवारी 40 अंश होता. पुढील दोन दिवस कमाल तापमानाची स्थिती अशीच राहणार असल्याचेही हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो काळजी घ्यावी. दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे तसेच डोक्यावर टोपी किंवा इतर एखादे पांढरे वस्त्र तोंडाला गुडाळावे असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे.