Heatstroke Cases – वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. एक मार्च पासून तीन मे पर्यंत राज्यात एकूण १८५ उष्माघाताचे रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून यातील दोन जणांचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्याच्या आरोग्य विभागाने केला आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पाहता सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये तर त्यानंतर नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांत तुलनेने जास्त रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादमध्ये मागील आठवड्यात रुग्णसंख्या जास्त होती, मात्र आता ती कमी झाली असून येथे २४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील आठवड्यात ४६ रुग्ण दाखल होते. काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण नव्हते तर तेथे रुग्ण दवाखन्यात दाखल झाले असून काही जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या अत्यल्प किंवा शून्य आहे. अहिल्यानगर आणि लातूर येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, सोलापूर आणि अकोला येथे प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यातील अकोला आणि लातूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा उष्माघातानेच मृत्यू झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले असून, दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि शरीर थंड ठेवण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले आहे.