Health Tips: हिवाळ्यात थंडी वाजणं स्वाभाविक आहे. मात्र एकाच खोलीत बसलेले काही लोक जास्त गारठतात, तर काहींना फारसा फरक जाणवत नाही. जर पुरेसे गरम कपडे घालूनही तुम्हाला आतून थंडी वाजत असेल, तर हे केवळ वातावरणामुळे नाही, तर शरीरातील काही पोषक घटकांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. आपलं शरीर अंतर्गत तापमान संतुलित ठेवण्यासाठी ‘थर्मोरेग्युलेशन’ ही प्रक्रिया वापरतं. यासाठी विशिष्ट जीवनसत्त्वं आणि खनिजांची गरज असते. जेव्हा या पोषक घटकांची कमतरता होते, तेव्हा रक्ताभिसरण मंदावते आणि चयापचय (मेटाबॉलिझम) कमी होतो. परिणामी शरीर पुरेशी उष्णता तयार करू शकत नाही आणि व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त थंडी वाजू लागते. ही समस्या अॅनिमिया किंवा थायरॉईडच्या त्रासाशीही संबंधित असू शकते. म्हणूनच कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी केवळ हीटरवर अवलंबून न राहता आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लोह आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता अतिरिक्त थंडी वाजण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोहाची कमतरता. लोहामुळे हिमोग्लोबिन तयार होतं, जे शरीरातील पेशींना ऑक्सिजन पोहोचवतं. लोह कमी झाल्यास शरीर अधिक संवेदनशील बनतं आणि थंडी जास्त जाणवते. तसंच, व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास नसांवर परिणाम होतो. त्यामुळे हात-पाय सुन्न होणे, थंड पडणे असे त्रास जाणवतात. मॅग्नेशियम आणि फोलेटही शरीरात ऊर्जा निर्मिती आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाचे असून शरीर गरम ठेवण्यास मदत करतात. अचानक जास्त थंडी वाजल्यास काय कराल? जर अचानक खूप गार वाटू लागलं, तर हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि शरीर पटकन गरम होतं. तसंच, एक ग्लास कोमट पाणी किंवा आलं घातलेल चहा प्या. रिकाम्या पोटी राहू नका, कारण अन्न पचताना शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण होते. आहारात करा हे बदल शरीरात उष्णता टिकवण्यासाठी गूळ, शेंगदाणे, खजूर, बाजरी यांसारखे उष्ण तासीरचे पदार्थ आहारात समाविष्ट करा. लसूण आणि आलं जास्त प्रमाणात घ्या, कारण ते रक्तवाहिन्या रुंदावतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. आहारात बदल करूनही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्ततपासणी करून घ्या, जेणेकरून पोषक घटकांची कमतरता अचूकपणे समजू शकेल. प्रतिबंधात्मक उपाय जास्त थंडी वाजण्याकडे दुर्लक्ष करू नका. हे कमी प्रतिकारशक्तीचंही लक्षण असू शकतं. पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी ठेवा, कारण मानसिक थकवाही शरीराच्या थंडी सहन करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. संतुलित, पोषक आहार आणि नियमित योग-व्यायाम केल्यास शरीराची अंतर्गत उष्णता टिकून राहते आणि तीव्र थंडीचा सामना सहज करता येतो.