Health Tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि डेस्क जॉबमुळे आपली शारीरिक हालचाल खूपच कमी झाली आहे. अनेक लोक रात्री जड जेवण केल्यानंतर लगेच झोपतात किंवा टीव्हीसमोर बसून राहतात. ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या जेवणानंतर फक्त १० ते १५ मिनिटे हलक्या गतीने चालणं शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेदात याला ‘शतपावली’ (जेवणानंतर शंभर पावलं चालणं) असं म्हटलं जातं. ही छोटीशी सवय पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते आणि अनेक आजारांपासून संरक्षण देते. १) पचनशक्ती मजबूत होते जेवणानंतर चालल्याने पोट आणि आतड्यांची हालचाल वाढते. त्यामुळे पचनरस नीट स्रवतात आणि अन्न लवकर पचतं. गॅस, आम्लपित्त, पोट फुगणं आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. २) रक्तातील साखर नियंत्रणात राहते मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही सवय फार उपयुक्त आहे. जेवणानंतर थोडं चालल्याने इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही. त्यामुळे टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो. ३) वजन कमी करण्यास मदत रात्री चालल्याने कॅलरीज जळतात आणि मेटाबॉलिझम वाढतो, जो रात्री सहसा मंदावतो. यामुळे अन्नातून मिळालेली ऊर्जा योग्य वापरली जाते आणि चरबी साचत नाही, विशेषतः पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. Walking After a Meal ४) हृदय निरोगी राहते नियमित चालण्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. ५) ताणतणाव कमी होऊन चांगली झोप लागते रात्रीची सैर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चालल्याने एंडोर्फिन हार्मोन स्रवतात, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होते. मन शांत राहतं आणि गाढ झोप लागण्यास मदत होते. ६) रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन आणि झोप व्यवस्थित असल्यास शरीराची इम्युनिटी आपोआप वाढते. चालल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि दुसऱ्या दिवशी अधिक ऊर्जावान वाटतं. कशी सुरू करावी ही सवय? जेवणानंतर धावणं किंवा जड व्यायाम करू नका फक्त हळू, आरामात चालणं पुरेसं आहे आरामदायक चपला घाला घराजवळ, गच्चीवर किंवा अंगणात चालायला सुरुवात करा आरोग्यासाठी घेतलेली ही १० मिनिटांची छोटी पायरी तुमचं भविष्य अधिक निरोगी आणि आनंदी बनवू शकते.